गेल्या काही दिवसांपासून १२ वी परीक्षेच्या निकालाबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अखेर मंगळवारी ०३ ऑगस्ट रोजी दुपारी ऑनलाईन निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९९.६३% एवढा लागला असून मागच्या वर्षीच्या तुलनेने ८.९७ %नी त्यामध्ये वाढ झाली आहे. यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १० वी सह १२ वीची सुद्धा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे निकालासाठी गुणांकन शालेय अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्याचे निकष तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली. त्या आराखड्याप्रमाणे दहावीसाठी ३०%, अकरावीसाठी ३०% आणि बारावीसाठी ४०% याप्रमाणे १००% गुणाप्रमाणे मुल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला.
मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाईन बारावी परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात १७ हजार ६६८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यातील १७ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ८९२५ मुले तर ८७४३ मुलींचा समावेश आहे. यात कोकण बोर्डाचा ९९.८१ तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला. जिल्यातील गुहागर, मंडणगड, राजापूर, संगमेश्वर, लांजा या पाच तालुक्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. रत्नागिरी तालुक्याचा निकाल ९९.८२ टक्के, चिपळूण तालुक्याचा निकाल ९९.९७ टक्के, दापोली तालुक्याचा निकाल ९९.७५ टक्के, खेड तालुक्याचा निकाल ९९.९१ टक्के, राज्यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून, औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.