24.4 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriशिस्तीत राहा, चर्चासत्र तर होणारच - नीलेश राणे

शिस्तीत राहा, चर्चासत्र तर होणारच – नीलेश राणे

बाकीचा महामार्ग होतो रत्नागिरीचा भाग का रखडतो, याचाही हिशोब झाला पाहिजे.

गुन्हेगारांना सोबत घेऊन चर्चासत्र उधळायचे, लोकांना बोलूच द्यायचं नाही, हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? लोकांना दडपशाहीने गप्प करण्याची ही पद्धत चालणार नाही. व्यवस्थेवर चर्चा तर होणारच आणि अशा चर्चासत्रात मी सुद्धा उपस्थित राहणार. त्यामुळे शिस्तीत राहा, असा इशारा भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला. रस्त्याच्या बिकट अवस्थेसह अनेक प्राथमिक आणि मूलभूत प्रश्नांमुळे त्रस्त झालेले रत्नागिरीतील सामान्य नागरिक रविवारी (ता. २८) शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र येणार होते. यामध्ये शहरातील समस्यांबाबत चर्चा करून  जनतेचा आवाज पालिकेपर्यंत कसा पोहोचवायचा, यावर चर्चा होणार होती; मात्र ही सभा होण्यापूर्वीच ती उधळण्यात आली. मुद्दे मांडणाऱ्यांना बोलूच न देता त्यांना धमकवण्यात आले, धक्काबुक्की करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते नीलेश राणे आक्रमक झाले. ते म्हणाले, या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. रत्नागिरीला १९९० मधलं बिहार करायचे आहे का ? सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती. त्यांना व्यक्तीबद्दल बोलायचे नव्हते. तरीही त्यांना बोलू दिले नाही. सभेत जे ५० ते ६० जण घुसले होते त्यातील काहींना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. म्हणजे अशा लोकांना घेऊन नागरिकांना धमकवायचे, त्यांना घाबरवायचा अधिकार कोणी दिला? गुन्हेगारांना सोबत घेऊन लोकांना धमकावले गेले, धक्काबुक्की केली गेली. हातातला माईक काढून घेतला गेला. पोलिस यावर कोणती अॅक्शन घेणार?

सभेत घुसलेल्यांनी महामार्गाच्या मांडलेल्या मुद्द्यांचाही नीलेश राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, महामार्गाच्या मुद्द्यावर नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक लावा. महामार्गाचा रत्नागिरीतील भाग आतापर्यंत अपूर्ण का राहिला, याचे उत्तर त्यामध्ये मिळेल. बाकीचा महामार्ग होतो रत्नागिरीचा भाग का रखडतो, याचाही हिशोब झाला पाहिजे. आम्ही उगाच कोणावर टीका करत नाही; पण आमच्या नेत्यांवर टीका केली तर ती सहन करून घेतली जाणार नाही. शिस्तीत वागा, रत्नागिरीत जर कुणाला विषयावर, व्यवस्थेवर चर्चा करायची असेल तर ती झालीच पाहिजे. आता सभा उधळत आहेत, घोषणा देत आहेत, उद्या घरात घुसायला मागेपुढे पाहणार नाहीत, असे राणेंनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular