28.4 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

बनावट कागदपत्राने वाहने विकणारी टोळी पकडली…

कोल्हापूर टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची...

चिपळूणात अतिवृष्टीने दरड कोसळली, घरांना धोका

शहरातील खंड भागात शुभम अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला...
HomeRatnagiriगंभीर रुग्णाला तत्काळ मिळणार उपचार, १०८ रुग्णवाहिका प्रकल्प

गंभीर रुग्णाला तत्काळ मिळणार उपचार, १०८ रुग्णवाहिका प्रकल्प

शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये 24 तास राबवण्यात येणार आहे.

विनामूल्य रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेण्यासाठी १०८ ही सुविधा गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. आता सुमित फॅसिलिटिज इंडिया, एसएसजी ट्रान्स्पोर्ट, स्पेन आणि या आधीचे सेवा पुरवठादार बीव्हीजी इंडिया यांच्यामार्फत ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ १०८ रुग्णवाहिका प्रकल्प राज्यात अंमलात आणणार आहेत. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्राचा वापर करून आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णाला गोल्डन अवर्समध्ये विशेष वैद्यकीय उपकरणांचा वापर करून जीव वाचवण्यावर भर दिला गेला आहे.

आरोग्य विभागाच्या नॅशनल हेल्थ मिशनअंतर्गत या प्रकल्पाचा उद्देश अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचा उपयोग करून गंभीर आणि अतिगंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलला येण्यापूर्वी आपत्कालीन आरोग्यसेवा प्रदान करणे, रुग्णांना स्थिर करणे आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये तत्परतेने पोहोचवणे यासाठी करण्यात येत आहे. हे मॉडेल भारतात प्रथमच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, ट्रान्स्फर तत्त्वावर तयार केले गेले. यामध्ये सेवा प्रदाता भांडवली खर्चाच्या ५१ टक्के योगदान करतील तर सरकार ४९ टक्के योगदान करेल.

नवा प्रकल्प शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये चोवीस तास राबवण्यात येणार आहे. त्यात फक्त रुग्णावाहिकाच नव्हे तर अत्याधुनिक आणि अत्यावश्यक केंद्रांमध्ये डॉक्टरचा समावेश केला गेला आहे. ज्यामुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत मिळेल. २०१३ मधील ९३७ रुग्णवाहिकेसाठी एकूण भांडवली खर्चाचे खरेदी मूल्य अंदाजे २४० कोटी रुपये होते. २०२४ मध्ये १७५६ रुग्णवाहिकेसाठी अंदाजे ८७० कोटी रुपयांपर्यंत ते वाढले आहे. अद्ययावत तंत्रज्ञान, विस्तारीत सेवा यामुळे हा खर्च वाढला आहे, अशी माहिती सुमित ग्रुपचे व्हाईस चेअरमन सुमित साळुंखे यांनी दिली.

मोफत आपत्कालीन सेवेबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी व्यापक माहिती, शिक्षण आणि संवाद मोहीम राबवली जाईल. तसेच कुशल आणि अकुशल अशा १४००० लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल. समान आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवेमुळे सार्वजनिक विश्वास आणि पारदर्शकता वाढेल. संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर केल्यामुळे आरोग्यसेवा खर्च कमी होईल आणि आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता सुधारेल, असा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular