एकीकडे शासनाने ई-केवायसी बंधनकारक केलेली असताना दुसरीकडे इंटरनेटचा अभाव, वारंवार होणारा सव्र्व्हरडाऊन आणि पॉस मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे ई-केवायसी केलेला डाटा हा पूर्णपणे करप्ट होत (गायब होत असल्याने) असल्याने रेशन धान्य दुकानदारांसह ग्राहकही हैराण झाले आहेत. स्वस्त धान्य दुकानात विक्री होणारी धान्याची गळती रोखण्यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केली. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ई-केवायसीसाठी शासनाने यापूर्वी ३१ डिसेंबर ही तारीख दिली होती; परंतु शासनाकडून या प्रक्रियेला आता मुदतवाढ दिली आहे. सर्व ग्राहकांचे रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत, तरीही धान्य वितरणात काही प्रमाणात गळती असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे ही गळती १०० टक्के थांबविण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.
यानुसार रेशन कार्डवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधार कार्ड घेऊन रेशन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे तसेच स्कॅन करून ही केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ग्राहकांनी रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती; मात्र पॉसमधील तांत्रिक बिघाडामुळे केवायसी पूर्ण केलेल्या अनेक ग्राहकांचा हा डाटा पूर्णपणे करप्ट (डिलीट) झाला आहे. याबरोबरच केवायसी करण्यासाठी असलेला इंटरनेटचा अभाव, सव्र्व्हर डाऊन होण्याचा प्रश्न यामुळे केवायसी करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा ई-केवासयी करावी लागणार आहे. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांचीही डोकेदुखी वाढली आहे.