काळबादेवी ते आरे-वारे या सुमारे चार किलोमीटरच्या टप्प्यातून सागरी महामार्ग नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) काळबादेवी किनाऱ्यावरील मार्गाचे पोलिस बंदोबस्तात आजपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. या पट्ट्यातून रस्ता उभारण्यासाठी तीन पर्याय तयार केले होते. त्यापैकी ग्रामस्थांनी सुचवलेला किनाऱ्यावरील पर्याय निश्चित केला आहे. उर्वरित दोन पर्याय तात्पुरते रद्द केल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. हे सर्वेक्षण दोन आठवडे सुरू राहणार आहे. रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे. काळबादेवी येथील खाडीवरील पूल बांधण्यात येणार आहे. त्याचा ठेकेदारही निश्चित झाला आहे. पुढील रस्त्याबाबत ‘एमएसआरडीसी’तर्फे स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली होती. काळबादेवीतून रस्त्यासाठी दोन पर्याय ठेवले होते. त्यात शेतजमीन आणि काही लोकांची घरे जाण्याची शक्यता होती.
त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्याला तीव्र विरोध केला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी काळबादेवी किनाऱ्यावरून आरे-वारेपर्यंत मार्ग न्यावा, अशी सूचना केली होती. एमएसआरडीसी’चे अधिकारी अजय झा यांनी आज सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत परिसराची पाहणी केली. हा मार्ग काळबादेवी किनाऱ्यावरील दर्यापासून धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या बाजूने आरे-पुलापासून ३०० मीटर आधी बाहेर पडणार आहे. खांबावरून पुलाप्रमाणे रस्ता बांधण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना प्रशासनाकडून सांगण्यात आले. गावात उतरण्यासाठी सेवा मार्ग ठेवण्यात येणार आहे. हा मार्ग किती व्यवहार्य ठरेल, त्यावर पुढील भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
मार्ग सीआरझेड-१ ए झोनमध्ये – किनाऱ्यावरून जाणारा हा मार्ग ‘सीआरझेड-१ ए’ या झोनमधून आणि वन विभागाच्या जागेतून जात आहे. त्यांची परवानगी घेण्यासाठी सीआरझेड आणि वन विभागाकडे प्रस्ताव सादर करताना पर्यायी आखणीबाबत सविस्तर अहवाल (Alternate Alignment Study Report) सादर करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने प्रस्तावित आखणीचे सविस्तर सर्वेक्षण केले जाणार आहे.