उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी आभार सभेला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदासभाई कदम, नामदार योगेश कदम, आमदार किरण सामंत, रविंद्र फाटक, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठविली. आभार मानायला आलोय यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नागरीकांचे आभार मानण्यासाठी व तुमच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी याठिकाणी आलो आहे. एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतोः एक बार मैने कमिटमेंट की, तो मै खुद की भी नहीं सुनता.. असा डायलॉग मारताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
खरे वारसदार कोण? – ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने भरभरुन प्रेम केले आहे. बाळासाहेबांचे कोकणवर प्रेम होते व कोकणी माणसाचे शिवसेनेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. या विजयात कोकणी माणसाचा मोठा वाटा आहे. कोकणात ९ जागा लढल्या ८ जिंकल्या, फक्त ८० जागा लढवल्या आणि ६० आमदार निवडून आणले. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण हे जनतेने ठरवलं आहे.. असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
मविआ केली उद्ध्वस्त – तसेच तेव्हा म्हणायचे, कोण एकनाथ शिंदे? कोण रामदास कदम ? आम्ही कोण आहोत हे दाखवलं. मला हलक्यात घेऊ नका, इथे दाढीवाल्यांची मेजोरीटी आहे. साहित्यिकांना दलाल म्हणता, जनाची नाही मनाची तरी ठेवा. कितीही आरोप करा, शिव्या द्या, जोपर्यंत लाडक्या बहिणी, शेतकरी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही, असे म्हणत दाढीने उध्वस्त केली महाविकास आघाडी असा टोलाही त्यांनी लगावला.
आता खाण्यावर व्हीप – दिल्लीतल्या खासदारांनी काय खायचं? कुठे जायचं? यावर व्हीप लावता. अरे किती अविश्वास दाखवता आपल्या माणसांवर? कोणाची लाईन कापून तुम्हाला मोठं होता येत नाही, तुम्ही तुमची लाईन वाढवा. असे म्हणत या कोकणाने ऑक्सिजन दिला, शिवसेना मोठी केली. त्यांना काहीही कमी पडू देणार नाही.. असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला..
‘खोक्यांवरुन टीका – मागील अडीच वर्षात खोके.. खोके.. म्हणत काही बोंबलत होते मात्र महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्याच खोक्यात बंद केले आहे. कुणाचे खोके कुठे जायचे? हे आमच्यापेक्षा नारायण राणे यांना जास्त माहिती आहे. रस्सी जळाली तरी पीळ जात नाही, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
स्वप्नातही मीच दिसतो – यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जसे मुघलांना संताजी, धनाजी यांची भिती होती, त्यांचा ध्यास घ्यायचे तसा माझा ध्यास काही घेऊ लागले आहेत. स्वप्नातही त्यांना दिसू लागलोय.. कोण एकनाथ शिंदे? कोण रामदास कदम ? म्हणणाऱ्यांना आम्ही दाखवून दिले. पुन्हा सांगतो, दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका.
विकासासाठी कटीबद्ध – भाषणाचा शेवट करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त करीत कोकणचा चेहरामोहरा बदलणार आहे. नवा महामार्ग उदयाला येणार असून त्याचे डीपीआर देखील तयार झाले आहेत. अनेक प्रकल्प कोकणात येऊ घातलेत. हा कोकण समृद्ध कोकण बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.