काश्मीर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊसबोटी दाखल झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून हाऊसबोटी चालवण्याचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. महिला भगिनींनी पुढाकार घेऊन उद्योग उभे करावेत आणि तो वाढवून रोजगारनिर्मिती करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. उद्योगासाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास ३५ टक्के सबसिडी दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुरत्न समृद्ध योजना २०२३-२४ पर्यटनवाढीस चालना देण्यासाठी उमेदअंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊसबोटीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राई बंदरात हा सोहळा झाला. डॉ. सामंत म्हणाले, ‘स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा हाऊसबोट आज इथे आहे. जिल्ह्यामध्ये अशा आणखी ४ हाऊसबोटी येणार आहेत. हा प्रकल्प अतिशय चांगला आहे. निसर्गरम्य वातावरणात तो निश्चितपणे आदर्शवत ठरेल. हा रत्नागिरी पॅटर्न राबवण्यासाठी सर्वजण पुढाकार घेतील.
काश्मीर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊसबोटी आहेत, असे अभिमानाने सांगता येईल. महिला प्रभागसंघांना देण्यात आलेली टुरिस्ट वाहनेही सातत्याने आरक्षित असतात. आणखी ६ वाहने द्यायची आहेत. ही वाहने चालवणारे चालक व वाहक दोघीही महिला असाव्यात. त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी माझी राहील. सध्याच्या युगात महिला पायलट उत्तम विमाने चालवतात. त्याप्रमाणे हाऊसबोटीची कॅप्टनदेखील महिला असावी. जिल्ह्यात सुरू केलेले उपक्रम पुढे चालू ठेवणे, ही आपली जबाबदारी आहे. महिला भगिनींनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे. त्यासाठी मानसिकता असावी. हाऊसबोटीच्या प्रकल्पाजवळ खाऊगल्ली तयार करा. त्यासाठी पुढाकार घ्यावा. न्याहारी निवासयोजना चळवळ म्हणून राबवण्यासाठी उमेदने पुढाकार घ्यावा. त्यामध्ये महिलांनी चांगले काम करावे.”
कार्यक्रमाला एकता महिला प्रभाग संघांच्या स्वरा देसाईंसह विविध बचतगटांचा महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बाबू म्हाप, बिपिन बंदरकर, विजय पाटील, सतीश शेवडे, सरपंच श्रुती शितप आदी उपस्थित होते.