राजापूर नगरपरिषदेसह तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीपैकी जवळपास ५० ग्रामपंचायतीनी रिफायनरी प्रकल्पास समर्थन दिले आहे. राजापूर तालुक्यातच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राजापूर शहरासह तालुक्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक संघटनांनी समर्थन दर्शविले आहे. रिफायनरी प्रकल्प मागणीसाठी महिलासुद्धा पुढे सरसावल्याचे पहायला मिळत आहे. होऊ घालणाऱ्या रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी समर्थन केले आहे.
रिफायनरीच्या विरोधात गावाबाहेरील एनजीओ गावात येऊन ग्रामस्थांना प्रकल्पाबद्दल भीती दाखवून अथवा खोटेनाटे त्यांच्या मनात रुजवून, त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एनजीओ वाले चालते व्हा, अशा प्रकारच्या घोषणा देत राजापूर रिफायनरीच्या समर्थनार्थ ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. राजापूर तालुक्यामध्येच रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी या स्थानिक ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.
जिल्ह्यामध्ये रिफायनरी प्रकल्पाबाबतचे जोरदार समर्थन वाढु लागले आहे. विशेष करून महिलानी एकत्र येऊन हा मुद्दा मांडला आहे. तसेच ज्या एनजीओ रिफायनरी झाली तर त्याचे कायमस्वरूपी दुष्परिणाम सोसावे लागतील असे वारंवार खोटे सांगत आहेत, अशा वातावरण दूषित करणाऱ्यांची आधी आम्ही हकालपट्टी करू आणि पुन्हा त्यांना येथे पाऊल सुद्धा ठेवायला देणार नाही असा निर्धार या महिलांनी केला आहे. देशात इतरही अनेक ठिकाणी रिफायनरी प्रकल्प उभे आहेत, पण आमच्या तरुण मुलांना स्थानिक ठिकाणीच रोजगार निर्माण झाला पाहिजे. जेणेकरून, अनेक सुशिक्षित बेरोजगार काम करण्याची संधी मिळून, काहीशा प्रमाणात अर्थार्जनाची संधी मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समर्थनाबाबत प्रकल्प इथेच राबवावा अशी मागणी जोर धरत आहे.