सध्या सुरु असलेला गणेशोत्सवाच्या काळामध्ये विक्रेते विविध प्रकारच्या मिठाई ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतात. परंतु, सुरु असलेला पावसाळा आणि कोरोनाचे संकट लक्षात घेता मिठाई विक्रेत्यांनी विशेष घ्यावयाच्या दक्षतेबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभाग यांनी मिठाई उत्पादक आणि व्यावसायिक यांच्यासोबत बैठक घेतली.
या बैठकीला रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संजय नारगुडे यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मिठाई व्यावसायिक आणि उत्पादकांना गणेशोत्सव काळात मिठाईबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत लेखी पत्रकेच देण्यात आली आहेत. हि पत्रके व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून विविध ग्रुपवर पाठविण्याचे आवाहन देखील यावेळी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना व मिठाई व्यावसायिकांना करण्यात आले.
त्या पत्रकामध्ये, जिथे मिठाई तयार केली जाते त्या आस्थापनेचा परिसर पर्यावरणीय रित्या स्वच्छ व कीटकांपासून सुरक्षित असावा, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा, तयार खाद्यपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीला इथे प्रवेश न देता, कोणताही पदार्थ हाताळायला देऊ नये, मिठाई तयार करताना फुडग्रेड खाद्यरंगाचा वापर १०० पीपीएमपेक्षा कमी करावा, मिठाईच्या दर्शनी भागावर पदार्थाच्या योग्यतेचा दिनांक नमूद करावा, मिठाई बनवणाऱ्या व हाताळणाऱ्या व्यक्तींनी कायम स्वच्छता बाळगून, मास्क, हातमोजे, टोपी व स्वच्छ अप्रन वापरावा, मिठाईवर वापरल्या जाणारा सोनेरी व चांदीच्या वर्खचा दर्जा उच्च असावा, त्याचप्रमाणे कोरोना नियमांचे पालन करावे आदी सूचना दिल्या.
मिठाई विक्रेत्यांना हे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी केले. सदर बैठकीला शहरातील प्रमुख मिठाई व्यावसायिकांची आणि उत्पादकांची उपस्थिती होती. मिठाई उत्पादक, विक्रेत्यांनी कायद्यांतर्गत तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मिठाईच्या दर्जाबाबत कुठलीही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या ८०५५४३६१८८ किंवा १८००२२२३८५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.