संगमेश्वर तालुक्यातील कसबा ते माभळेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर विशेषतः सोनवी पुलाजवळ आणि पैसाफंड हायस्कूलसमोर खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहनचालकांसाठी संकट ठरत असून, तिथे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. हे खड्डे वाचवण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचे स्थानिकांचे मत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी करूनही सोनवी पुलाजवळील खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे आणखी धोकादायक बनत आहेत. रस्त्यावरून वाहने चालवणे शक्य होत नाही. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे एखादा अपघात झाला तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सरकारने रस्त्यांचे काम करताना ठराविक निकष आणि दर्जा पाळणे बंधनकारक केले आहे.
जर हे खड्डे वेळेत भरले नाहीत तर अपघाताला निमंत्रणच दिल्यासारखं आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून खड्डे भरावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, रविवारी (ता. २२) पत्रकारांबरोबर झालेल्या वार्तालापावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामाची पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे तसेच संगमेश्वर टप्प्यातील काम वेगाने सुरू असून, तेथील खड्डे तात्पुरते बुजवण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवापूर्वी कार्यवाहीची अपेक्षा – यंदा मे महिन्यात पाऊस सुरू झाला असला तरीही जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे खड्डे भरण्याची मोहीम हाती घेणे आवश्यक होते. यंदा गणेशोत्सव लवकर असल्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. त्यापूर्वी तरी हे खड्डे भरले जातील आणि चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.