मुंबई साकीनाका परिसरात घडलेल्या अमानवी बलात्कार घटनेनंतर मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न! यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशा गुन्हेगाराना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा सवाल जनसामान्यातून विचारला जात आहे. मुंबईत या घटनेमुळे महिलांसाठी पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या उपाय योजनांबाबत पोलीस दलासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माता-भगिनींची केलेली टिंगल-टवाळी कदापि खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाय योजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली सूचना अखेर त्यांनी मान्य केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून यापूर्वी सतत मागणी केली जात होती कि, परप्रांतियांची महाराष्ट्रात येण्य़ापूर्वी नोंदणी ठेवा. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापुढे परप्रातियांची नोंद ठेवण्याचे महत्त्वाचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत. मात्र साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला असताना मुख्यमंत्र्यानी हि मागणी अंमलात आणण्याचे कडक निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे देर आए, पर …….. म्हणजेच उशीरा का होईना पण राज ठाकरेंचा परप्रांतियांबद्दलचा मुद्दा आणि सूचना मुख्यमंत्र्यांना पटला असून त्यांनी ती मागणी अखेर मान्य केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायम आपल्या भाषण, जाहीर सभा, पत्रकार परिषदेमधून प्रत्येकवेळी परप्रांतियांचा मुद्दा लावून धरला आहे, यात परप्रातियांची नोंदणी करत ते कुठल्या राज्यातून आणि कधी आले या संदर्भात माहिती सरकार, पोलिसांना असावी अशी मागणी वारंवार केली आहे. अखेर आता मुख्यमंत्र्यांना हा मुद्दा पटला असून त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.