वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली. सकाळी गडनरळ गावातील १२ अर्जासाठी ६० ग्रामस्थांच्या हरकतींवरील म्हणणे ऐकून घेण्यात आले. शेती, आंबा बागायत, राहती घरे भूसंपादन प्रक्रियेतून वगळण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. प्रकल्पाबाबत गडनरळवासीयांनी सकारात्मकता दर्शवली. प्रशासनानेही सहकार्याची भूमिका घेतली. गेले आठवडाभर सुरू असलेल्या या हरकतींवरील वैयक्तिक अर्जावरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. वाटद एमआयडीसी संदर्भात हरकतींवर आज गडनरळ गावातील ग्रामस्थांच्या वैयक्तिक अर्जावरील सुनावणी झाली. सकाळी ११ च्या सुनावणीसाठी गडनरळ गावातील हरकती दाखल केलेल्या ६० ग्रामस्थ सुनावणीसाठी हजर होते. आमच्या बहुतांश जमिनींवर शेती आणि आंबा बागायती, घरे आहेत. अशा जमिनी भूसंपादन प्रक्रियेतून वगळण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे प्रांताधिकारी देसाई यांनी सांगितले.
यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे उपस्थित होत्या. तालुक्यातील वाटद एमआयडीसी येथे प्रस्तावित असलेल्या रिलायन्स कंपनीसाठी २२ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यासंदर्भात संबंधित जमीन ग्रामस्थांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. या हरकतींवर ४ जुलैला कोळीसरे आणि मिरवणे, ७ला कळझोंडी आणि वाटद आणि १० जुलैला गडनरळ येथील ग्रामस्थांची वैयक्तिक अर्जावरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली. प्रत्येक सुनावणी दरम्यान ग्रामस्थांकडून मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यांची मागणी आता शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रांताधिकारी श्री. देसाई यांनी सांगितले.
शेती आणि घरांचा विचार व्हावा – शेती, आंबा बागायत, राहती घरे भूसंपादन प्रक्रियेतून वगळण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. प्रकल्पाबाबत गडनरळवासीयांनी सकारात्मकता दर्शवली. प्रशासनानेही याबाबत सहकार्याची भूमिका घेतली.