लाचलुचपत कार्यालयात उप अधिक्षक पदावर श्री. सुशांत चव्हाण यांची नेमणूक झाली असून, रुजू झाल्यानंतर लगेचच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले कि, भ्रष्टाचार नियंत्रित करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खाते अपडेट होत असून ते आता थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन संबंधितांवर कारवाई करणार आहे. त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे
श्री. चव्हाण हे यापुर्वी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या बढतीपर ते रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये उप अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. ते म्हणाले की भ्रष्टाचार हा सर्वत्रच असतो. पण समाजाचे काम योग्य आणि वैध पद्धतीने चालण्यासाठी अशा अनैतिक प्रकारांना जरब बसणे आवश्यक असते. मात्र तक्रारदार काही अडचणी, भीतीमुळे किंवा काही असणाऱ्या गैरसमजुतीमुळे तक्रार द्यायला पुढे धजावत नाहीत.
तक्रारदारांच्या समस्यांवर मात करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत हा विचार सुरु करण्यात आला आहे. तक्रारदार जोपर्यंत सहन करणे शक्य आहे, तोपर्यंत अनेकदा अशा अनैतिक प्रकारांना सहन करताना दिसून येतो. काहीवेळा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कार्यालय लांब असल्यानेही अनेकदा तक्रारदार लांबवर जाऊन तक्रार देणे टाळतो, या परिस्थितीचा सारासार विचार करून आता लाचलुचपत प्रतिबंधक खातेच आपल्या दारी येण्याची संकल्पना राबविण्यात येणार असून तक्रारदाराने आमच्याशी संपर्क साधला आणि तो लांब राहणार असेल तर आमची टीम तिथे जाऊन त्याची तक्रार दाखल करून घेऊ शकते, त्याशिवाय याच माध्यमातून तक्रार दिल्यानंतर जबाब, अन्य कागदपत्रे यासाठी होणारी तक्रारदाराची धावपळ सुद्धा कमी केली जाणार आहे. यातून तक्रारदाराचा वेळ, पैसे सुद्धा वाचणार आहेत. याशिवाय तक्रारदार व्हाट्सअपद्वारेही तक्रार देऊ शकणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी विश्वासाने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा आणि भ्रष्टचारमुक्त समाज निर्माण होण्यासाठी सहकार्य करावे. त्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर मारुतीमंदिर येथील लाचलुचपतच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.