अनेक वर्षे रखडलेल्या येथील विमानतळाच्या विकासकामांना वेग मिळाला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विमानतळाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. रत्नागिरीच्या टर्मिनल इमारतीचे काम ३५ टक्के पूर्ण असून, एप्रिल २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतून प्रवासी हवाई वाहतूक सुरू व्हावी यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. काही महिन्यांपासून येथील विकासकामांनी वेग घेतला आहे. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी याकडे विशेष लक्ष दिले आहे. या भागाला भेट देत अधिकारी व ठेकेदारांशी वारंवार चर्चा करत टर्मिनल बिल्डिंगचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नुकतीच आमदार किरण सामंत यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई व अन्य अधिकारी उपस्थित होते. विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम जवळपास ३५ टक्के झाले आहे. एमआयडीसीने हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. शहरातून विमानतळापर्यंत केबल टाकण्याचे काम थांबविले आहे. याबाबत बांधकाम विभाग आणि प्रांताधिकारी यांच्यात चर्चा होऊन लवकरच निर्णय घेतला जाईल. विमानतळावरील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी रस्त्याशेजारून टॅक्सी ट्रॅकच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
जमीन कोस्टगार्डला लवकरच हस्तांतरित – विमानतळासाठी डीव्हीओआर ही नेव्हिगेशन यंत्रणा बसवण्यासाठी ७.२२ हेक्टर जमीन कोस्टगार्डला हस्तांतरित करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांना सूचना केली. त्या व्यतिरिक्त आणखी ७ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कमी दृश्यमानता असताना पायलटला सुरक्षित विमानात उतरवता येण्यासाठी आवश्यक असणारे इन्स्ट्रुमेंट लॅण्डिंग सिस्टिम बसवण्यासाठी आणि विमानतळाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करता येतील. यासाठी आणखी पाच ते सात हेक्टर जागा संपादित करण्यावरही चर्चा करण्यात आली.