मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या ६८०० मतांनी मागे पडलेल्या प्रशांत यादव यांना येत्या पाच वर्षांत भाजप पक्षाकडून ताकद दिली जाईल. त्याच्या जोरावर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून ते आमदारही होतील, असा विश्वास मत्स्य व बंदर विभागाचे मंत्री नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केला. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही दिले. चिपळूण दौऱ्यावर आलेल्या मंत्री नीतेश राणे यांनी प्रशांत यादव यांच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती देताना म्हणाले की, काँग्रेस पक्ष आम्ही पाहिला आहे; परंतु भारतीय जनता पक्षासारखा पाठीशी उभा राहणारा दुसरा राजकीय पक्ष नाही. तेव्हा यादव यांच्या सोबतही ही ताकद कायम उभी राहील. आतापर्यंत मी स्वतः तीन निवडणुका लढलो आहे; परंतु ६ हजार ८०० मर्ताच्या फरकाने निवडणुकीला सामोरे जाणे सोपे नाही.
यादव यांनी आधीच स्वतःला सिद्ध केले असून, त्याचा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल; मात्र त्यासाठी यादव यांना पद देऊन त्यांची ताकद वाढवायला हवी. त्यांच्या नावापुढे पद नसेल तर ते काय करणार? ते निधी कसा देणार असे प्रश्न असून, भाजप त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा नियोजनच्या निधी वाटपावरून माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी वेळोवेळी भूमिका मांडली. त्याचे कारणही तसेच आहे. राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी २०-२० कोटींचा निधी दिला जातो; परंतु खासदार नारायण राणे यांच्या वाट्याला केवळ ५ कोटींचा निधी येतो. यासाठी जिल्हा नियोजन समितीत भाजपची ताकद दाखवण्याची गरज आहे.
… तर त्यांना न्यायदेवता आठवते – आमदार भास्कर जाधव यांच्या वादग्रस्त पत्रकाबाबत राणे म्हणाले की, जाधव यांची ही भूमिका वैयक्तिक आहे की, ठाकरे सेनेची आहे? ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे. ही भूमिका पक्षाची असेल तर त्याला आम्ही त्या पद्धतीचे उत्तर देण्यास तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या मनाप्रमाणे काही नाही झाले की, त्यांना लोकशाही धोक्यात आल्यासारखे वाटते. लोकसभेत मनासारखे खासदार निवडून आले तेव्हा लोकशाही धोक्यात दिसली नाही. मनासारखे झाले नाही की, त्यांना न्यायदेवता आठवते, असा टोलाही राणे यांनी लगावला.