बीएसएनएल (भारतीय दूरसंचार निगम लि.) कंपनीने जिल्ह्यात नव्या जोमाने काम सुरू केले आहे. खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना जिल्ह्यात ४ जीचे १८८ नवीन टॉवर उभारण्यात येत आहेत. त्यापैकी १४० टॉवर सुरू झाले आहेत. भविष्यात ग्राहकांना सर्वांत स्वस्त आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बीएसएनएलचे नेटवर्क जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचले पाहिजे, हे मुख्य उद्दिष्ट, अशी माहिती बीएसएनएलच्या येथील महाप्रबंधक अमृता लेले यांनी दिली. केंद्र शासनाला उशिरा का होईना; पण जाग आली आणि टुजी सेवेमध्ये असलेल्या बीएसएनएला नवसंजीवनी देण्यासाठी फोरजी सेवा सुरू केली. त्यामुळे बीएसएनएल कंपनीला पुन्हा चांगले दिवस येणार, हे निश्चित आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी कंपनीने जिल्ह्यात बीएसएनएलचे १८८ नवीन फोर-जी टॉवर मंजूर झाले.
त्यापैकी १४० टॉवर उभारले आहेत. कंपनीचे जिल्ह्यातील एकूण टॉवर ३६२ झाले आहेत. त्यामुळे नेटवर्कमध्ये चांगली सुधारणा झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. उर्वरित टॉवर लवकरच उभारले जाणार आहेत. पावसामुळे हे काम रेंगाळले होते. त्यात टॉवरना शेवाळ धरल्याने कामांमध्ये अडथळा येत होता; परंतु आता नव्या जामाने काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सुमारे पावणेतीन लाख बीएसएनएलचे ग्राहक आहेत. बीएसएनएलच्या नव्या सेवेमुळे दिवसाला सुमारे ८० ते १०० ग्राहक नव्याने मिळत आहेत. ज्या ठिकाणी महावितरणची जोडणी नाही, तेथे सोलर आणि इंजिनद्वारे वीजपुरवठा केला जातो. तर ७१ ठिकाणी महावितरणची जोडणी मिळाली आहे.
जिल्ह्यात १६०० लॅण्डलाईन धारक – जिल्ह्यात अजूनही एक हजार ६०० लॅण्डलाईन धारक आहेत, तर सहाशेच्या वर एफटीपी फायबर लाईन घेतलेले ग्राहक आहेत. जोवर सर्व कन्व्हर्ट होत नाहीत, तोवर ही सेवा सुरू राहणार आहे. त्यांना कॉपर केबलने सर्व्हिस दिली जात होती; परंतु आता फायबरने सर्व्हिस दिली जाणार असल्याने स्पीड वाढणार आहे, असे लेले यांनी सांगितले.
मुंबईतही एमटीएनएल ऐवजी बीएसएनएल – जिल्ह्यातील अनेक नोकरदार मुंबईमध्ये कामाला आहेत; परंतु जेव्हा जिल्ह्यात येतात, तेव्हा बीएसएनएलची सेवा मिळते. मुंबईत गेल्यानंतर मात्र ती एमटीएनएलमध्ये वर्ग होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा ग्राहकवर्ग तुटत होता; परंतु आम्ही केंद्र शासनाला प्रस्ताव देऊन एक नोव्हेंबरपासून मुंबईतदेखील बीएसएनएलची सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यामुळे बीएसएनलचा ग्राहक नक्कीच वाढणार आहे, असा विश्वास लेले यांनी व्यक्त केला.

