रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते ३ डिसेंबर निकालापर्यंतची तयारी झाली आहे. केंद्रांवरील सुविधांपासून ते कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीची यंत्रणा तयार आहे. ६९ मतदान केंद्र असून ६४, ७४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली. पालिकेच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी वैभव गारवे उपस्थित होते. देसाई म्हणाले, मतदारांची अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरला प्रभागनिहाय प्रसिध्द करण्यात आली. त्यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ७६ हजार २२९ आहे. पालिकेचे १६ प्रभाग असून या प्रभागातून ३६ नगरसेवकांना निवडून दिले जाणार आहेत.
शहरात पुरुष मतदारसंख्या ३१,३२४ तर महिला मतदारसंख्या ३३,४२१ आणि इतर मतदार एक इतकी आहे. प्रभाग १३ मध्ये सर्वात जास्त मतदार १०३७ तर सर्वांत कमी ८०२ मतदार प्रभाग २ मध्ये आहेत. ६९ मतदान केंद्रामध्ये १ मतदान केंद्र १४ ठिकाणी आहे, २ मतदान केंद्र असलेली ठिकाणेही १४ आहेत. ३ केंद्र असलेली ठिकाणे ६, ४ केंद्र असलेली ठिकण १, ५ केंद्र असलेली ठिकाण १ आहे. सर्व मतदान केंद्रांची प्रशासनस्तरावर पाहणी झाली आहे. त्याठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीत मतदार एका प्रभागातून दोन सदस्य आणि एक थेट नगराध्यक्ष, अशा तिघांना मतदान करावे लागणार आहे.
३०३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती – प्रशासनस्तरावर एका आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. एका केंद्रावर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी असतील. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनस्तरावर २७६ कर्मचारी व २७ राखीव अशा एकूण ३०३ कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती केली आहे. ३० नोव्हेंबर रात्रौ १० वाजेपर्यंत प्रचाराची मुदत आली आहे.

