टीव्हीवरील प्रचंड गाजत असलेला बिग बॉस-३ कार्यक्रम अनेक कारणांनी कायमच चर्चेत असतो. विविध क्षेत्रातील कलाकार यामध्ये समाविष्ट असतात. त्यातील एक अत्यंत लहान वयामध्ये राज्यभर महिला कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीस आलेल्या शिवलीला पाटील या बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणत टीकेची झोड उठलेली.
सोशल मीडियावर नेटकऱ्यानी त्यांना चांगलेच ट्रोल केल्याने शिवलीला त्यावर आपले काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. तिने त्यावर सांगितले कि, महाराष्ट्राची संस्कृती, आपला वारकरी संप्रदाय, सोबतची कीर्तन परंपरा याबाबत हा शो पाहणाऱ्या मराठी आणि अमराठी वर्गाचे प्रबोधन करावे याच निव्वळ हेतूने मी बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये दाखल झाले होते.
पण माझ्यावर मी पैसे आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी गेल्याचे आरोप करण्यात आले, मात्र आपल्याला त्याची गरज नसल्याचे शिवलीलाने सांगितले. आपली संस्कृती या फिल्मी प्रेक्षकांपर्यंतपर्यंत पोहोचवणे याच निस्वार्थ हेतूने मी तेथे जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मला जनतेने मात्र यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मला ट्रोल केले.
वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी जर माझ्या बिग बॉस सिझन ३ मध्ये सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयाने नाराज झाले असतील तर मी त्यांची दोन हस्तक आणि एक मस्तक टेकवून माफी मागते. माझे विचार पोहचवण्यासाठी मी निवडलेला मार्ग चुकीचा निघाला असला तरी, माझा उद्दात्त हेतू मात्र अतिशय प्रामाणिक होता अशी भूमिका कीर्तनकार शिवलिला पाटील हिने व्यक्त केली.
अनेकानी डोक्यावर पदर नाही म्हणून सांगितले, मात्र मी तेथेही जे कीर्तनाच्या व्यासपीठावर करते तेच तेथे केल्याचे तिने सांगितले.मी गाण्यावर नाचल्याबाबत आक्षेप घेतले गेले मात्र मी नाचले ते पहिले गाणे विठुरायाच्या वारीचे होते तर दुसरे गाणे आई तुळजाभवानीचे होते. मात्र यानंतर इतर कोणत्याही हिंदी गाण्यावर ना माझे हात हलले ना पाय अशा शब्दात तिने स्पष्ट सफाई दिली.
वारकरी संप्रदाय काही बिग बॉस हा शो पाहत नाही हे मलाही माहित आहे. मात्र ज्या प्रेक्षकांना वारकरी परंपरा माहित नव्हत्या त्यांना त्या माहिती झाल्या. मी तिथे गेल्यानंतर रोज सकाळी न चुकता, सर्वजण तुळशी वृंदावनाच्या पाया पडू लागले तेथे ‘बोला पुंडलिक वरदाचा नाद घुमू लागला’ हेच माझे यश असल्याचे सांगताना तेथील विकृतीची प्रकृती बदलून दाखविल्याचे शिवलीलाने सांगीतले. यापुढे मात्र ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही.