आयआरसीटीसीने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी श्री रामायण यात्रेची योजना आखली आहे. श्री रामायण यात्रा आजपासून म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आयआरसीटीसीने देखो अपना देश कार्यक्रमांतर्गत श्री रामायण यात्रेला सुरूवात केली आहे. श्री रामायण यात्रेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आला आहे. ही यात्रा दिल्ली सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून प्रवास सुरू होऊन पुढे येणाऱ्या प्रभू रामाच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणे दाखविली जाणार आहेत. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला श्री रामायण यात्रे अंतर्गत धार्मिक सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
या ट्रेनचा पहिला थांबा अयोध्या असेल, जिथे यात्रेकरूना नंदीग्राममधील भारत मंदिराशिवाय श्री रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमान मंदिराला भेट देता येईल. यानंतर बिहार मधील सीतामढीला रवाना होतील. त्यानंतर जनकपूर येथील राम-जानकी मंदिराला सुद्धा भेट देणार आहे. यानंतर यात्रेकरू वाराणसीला रवाना होतील. वाराणसीहून प्रवासी प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटला फिरायला जातील. तिथून नाशिकला नेण्यात येईल. याठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पंचवटीला भेट देण्यात येईल. यानंतर यात्रेकरू हंपीला रवाना होतील, हंपीमध्येच किष्किंधा हे प्राचीन शहर वसले होते. यानंतर प्रवासी या दौऱ्याचे शेवटचे ठिकाण असलेल्या रामेश्वरमला भेट देतील.
या प्रवासाअंतर्गत सेकंड एसी क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती ८२,९५० रुपये एवढी रक्कम आकारण्यात येणार आहे. तर, फर्स्ट क्लास एसीमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती १,०२,०९५ रुपये इतका दर आकारण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान यात्रेकरूंना एसी हॉटेलमध्ये राहण्याची सोय, जेवण, प्रेक्षणीय स्थळांच्या भेटीसाठी एसी वाहने आणि प्रवाशांचा प्रवास विमा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.