संपूर्ण राज्यामध्ये सुरु असलेले एस.टी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. राज्यातील बरेच डेपो त्यांच्या मागण्यांसाठी आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. हाय कोर्टाच्या मनाई आदेशाला सुद्धा झुगारून, एसटी कर्मचार्यांनी संप अजून सुरूच ठेवला आहे.
जिथे प्रशासन अजून मागण्या मान्य करत नाही, तिथे होम मिनिस्टरच्या आदेशावरून रत्नागिरी जिह्यातील दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले आहेत. सगळीकडे संप सुरु असताना कुठेतरी नोकरी जाण्याची सुद्धा भीती मनामध्ये डोकावत असल्याने, काल रविवारी दुपारी ३ वाजता सुटणारी दापोली-ठाणे या शिवशाही बसवर ड्युटीवर हजर होण्यासाठी चक्क ते हातात बांगड्या भरून हजर झाले व शिवशाही प्रवासी बस घेऊन ते ठाण्याकडे रवाना झाले आहेत.
राज्यभर सुरु असलेल्या बेमुदत संपाला नाकारून, दापोली एसटी डेपोतील चालक अशोक वनवे यांनी सांगितले की, आमच्या होम मिनिस्टरने सगळीकडे संप सुरु आहे तर कामावर जाऊ नका, आणि तरीही गेलात तर हातात बांगड्या भरून जा असे सांगितले.
आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने, कामावर हजार न झाल्यास मेमो मिळेल याची सुद्धा भिती मनात होती. पुढे सांगताना ते म्हणाले कि, आमच्यातीलच काही कर्मचारी अल्प पगारामुळे, तसेच काही अपुर्या मागण्यांमुळे आत्महत्या करत आहेत. त्यामुळे यंदा आमच्या कर्मचारी कुटुंबाने दिवाळीच साजरी केली नाही. त्यामध्ये अवघ्या तेरा हजार रुपयाच्या तुटपुंज्या पगारामध्ये घर तरी कसे चालवायचे आणि सण तरी कसे साजरे करायचे असा यक्ष प्रश्न आम्हा सर्व कर्मचार्यांसमोर उभा आहे असे आंदोलनकर्ते वनवे यांनी सांगितले.