जिल्हा परिषदेमध्ये वर्ग १ व वर्ग २ ची २४४३ पदे रिक्त आहेत. मंजूर पदे ११४९३ असून फक्त ९०५० भरली आहेत. यामध्ये सरळसेवा, पदोन्नती पदांचा समावेश आहे. शिवसेना सत्तेत असताना देखील या आधीच विलंब झालेल्या पदभरतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तसेच पूर्वीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि विद्यमान शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी गेल्या १५ वर्षांत जिल्हा परिषदेकडे म्हणावे तसे लक्ष पुरवले नाही. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली, गावातील रस्त्यांची वाट लागली. कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. जनता हैराण झाली आहे, याचे श्रेय सत्ताधारी घेणार का, असा थेट सवाल भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केला.
मंत्री सामंत हे सातत्याने राज्यात सत्ता असलेल्या पक्षात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून विकासकामांची जनतेची अपेक्षा असते, असेही पटवर्धन म्हणाले. कोरोना महामारीमध्ये जिल्ह्याची झालेली अवस्था, अपुरा वैद्यकीय स्टाफ, ऑक्सिजन, बेडची कमतरता खूप भयावह होती. विलगीकरण, टाळेबंदी, लसीकरण असे सर्व सुरू असताना आरोग्य विभागासह अन्य विभागांमध्ये अत्यावश्यक असणारी रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? त्यामुळे विकासकामांवर परिणाम होताना दिसत आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी आवाज उठवला पाहिजे.
जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, लांजा, दापोली, राजापूर, मंडणगड, दापोली येथील शिक्षणाधिकारी. प्राथमिक, निरंतर शिक्षक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक , प्राथमिक , लेखाधिकारी शालेय पोषण आहार, अधीक्षक रा. प. प्राथमिक, माध्यमिक, गट शिक्षणाधिकारी ही पदे रिक्त आहेत. बदली, पदोन्नती, सेवानिवृत्ती अशा कारणांमुळे ही पदे रिक्त असून पुन्हा भरतीच करण्यात आलेली नाही. दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे पदभार दिला जात असल्याने, खूप विलंब होत असून कोणतेही काम वेळेवर होत नसल्याचा आरोप अनिकेत पटवर्धन यांनी केला.
माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. अनिकेत पटवर्धन यांनी २२ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे पत्रकारांना माहिती सांगितली आहे.