केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचे वय १८ वर्षावरून २१ वर्षे करण्याला मुस्लीम संघटनांनी विरोध दर्शविला आहे. मुलीच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यासंदर्भात केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्र सरकारच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, अविवाहित लोकांच्या हातात आपला देश आहे, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत, अशी खोचक टोला लगावला आहे. महिलांचे विवाहाचे वय जर २१ झाले, तर मग पुरुषांचे वय २५ केले जाणार का, असा थेट सवाल केला जात आहे.
देशात जो कुणी सज्ञान व्यक्ती आहे, त्याला आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह होऊ शकत नाही. पण असे तर नाही ना, की लोकांनी लग्नच करू नये, या दिशेने मोदी सरकार देशाला घेऊन जायचा प्रयत्न करत आहे का, अशी उपहासक विचारणा करत, हा देश अविवाहित लोकांच्या हातात असून, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
नवाब मलिक पुढे म्हणाले कि, पती-पत्नीमध्ये वयाचे ठरविक अंतर असणे गरजेचे आहे. अविवाहित मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना काय वाटते, हे महत्त्वाचे नाही. तर जनतेला काय अपेक्षित आहे, हे महत्त्वाचे आहे. सज्ञान व्यक्तीला मतदान करण्याचा, पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे, तर त्याला आपल्या लग्नाबाबत निर्णय घेण्याचा पूर्णत: अधिकार असायलाच हवा. १८ व्या वर्षी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. १८ वर्षांमध्ये व्यक्तीला सज्ञान म्हणून घोषित केले जाते, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.