आयुष्यात कितीही संकट आले तरी, त्यावर आत्महत्या हा पर्याय अयोग्य आहे. आलेल्या संकटाना धीराने सामोरे जाणे गरजेचे असते. अनेक जण संकटाना घाबरून आधीच हार पत्करून आत्महत्येचा मार्ग निवडतात, हे पूर्णत: चुकीचे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी काही न काही तरी मार्ग, उपाय असतोच. त्यामुळे मुख्य करून तरुणांनी मागचा पुढचा विचार न करता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे चुकीचे आहे.
काल भाट्ये येथील पुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, किनार्यावरील काही तरुणांनी त्याला उडी मारताना पहिल्याने, छोट्या होडीच्या सहाय्याने या तरुणाचे प्राण वाचविले. सलमान नजीर होडेकर,आफान रऊफ वस्ता, अरमान नजीर होडेकर, असे या जीव वाचविणार्या तरुणांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, अतुल बागडे या तरुणाने १२ वाजता राजीवडा-भाट्ये पुलावरून समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, खाडीत बुडणाऱ्या अतुल याचा राजीवडा येथील तरुणांनी तात्काळ छोटी होडी घेऊन जीव वाचवला. यापूर्वीही अनेकानी या भाट्याच्या पुलावरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आणि काल सारखेच राजीवडा येथील स्थानिक मच्छीमारांनी बुडणाऱ्या अनेकांचे जीव वाचविले आहेत.
मच्छीमारांना दाखवलेल्या या प्रसंगावधाना बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण अशा प्रकारे होणार्या आत्महत्या या नक्कीच चिंताजनक आहेत. अतुल याने का भाट्याच्या पुलावरून खाडीमध्ये उडी घेतली याचे कारण मात्र अजून गुलदस्त्यात आहे. पण शुल्लक कारणावरून होणार्या आत्महत्या हे नक्कीच गंभीर आहे.