ख्रिसमस, नवीन वर्ष आणि कोरोना यांचा ताळमेळ साधण्यासाठी मुंबई मध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि परदेशाहून लोक मुंबईमध्ये दाखल होत आहेत. नव्या व्हेरीयंटच्या संसर्गाच्या भीतीमुळे मुंबईमहानगर पलीक खूप दक्ष झाली असून, बाहेरून येणाऱ्या विमान प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने झपाटय़ाने वाढ होऊ लागली असल्याचे चिन्ह दिसत आहे. बुधवारी मुंबईमध्ये करोनाचे दोन हजार ५१० नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळी मुंबई पोलिसांनी शहरामध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा केली आहे.
आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ७ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील असं सांगण्यात आलं आहे. मुंबईमध्ये लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही आहे. १४४ कलम हे जमावबंदी साठी असल्याने जर नियमांचे उल्लंघन करणारे कोणी आढळले तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळय़ा किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेह समारंभ अथवा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे मुंबईतील पार्ट्यांवर बंधन घातल्यानंतर आता हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कोणत्याही मोकळ्या अथवा बंदिस्त जागांवर ३० डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त एकत्र येण्यास बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी, शासनाने आखून दिलेले निर्बध पाळणे गरजेचे आहे.