मागील चोवीस तासात शंभर नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या तिनशेच्या पुढे गेली आहे. वाढती रुग्ण संख्या जिल्ह्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. यासाठी विशेष करून लसीकरण आणि कोरोना निर्बंध यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांत रुग्ण संख्या सातत्याने वाढतच चालली आहेत. दोन दिवसांत पावणे दोनशेहून अधिक रुग्ण सापडले असून, या चोवीस तासामध्ये १०५३ रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १०० नवे संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर ९५३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तसेच त्यातील १५ जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ३१५ अॅक्टिव्ह केसेस असून त्यामध्ये २३४ गृहविलगीकरणात तर ८१ रुग्णालयामध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत. जिल्ह्यात मागील चोवीस तासात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक २८ रुग्ण सापडले आहेत तर रत्नागिरीत १७ , राजापूर ८, लांजा ३, संगमेश्वर १, दापोली १९, खेड १५, गुहागर ६, व मंडणगडमध्ये १ रुग्ण सापडले आहेत.
कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येसह नव्या विषाणूच्या चिंतेने आरोग्य विभाग पुन्हा चिंतेत दिसू लागला आहे. दिवसेंदिवस या रुग्णसंख्येमध्ये वाढच पाहायला मिळत आहे. राज्यात सुद्धा काल तब्बल १२ हजार १६० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १७४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे.
देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आज ६८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत ५७८ ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी २५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.