राज्यातील बेमुदत सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या संप प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळेच वळण लागत आहे. मागील दोन महिने संपकरी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले नसल्याने, कर्मचारी आर्थिक तोटा सहन करत आहेत. एसटी कर्मचार्यांना न्यायलयीन पाठबळ देणाऱ्या वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे काही दिवस उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होते, तर राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या पगारात कपात केली का? असा सवाल संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषदेत केला होता. त्याला शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्त्युत्तर देत एसटी कर्मचाऱ्यांकडून संघर्षाच्या नावाखाली भरमसाठ वर्गणी गोळा केली, त्याचा हिशोब कोण देणार ! असा प्रती सवाल केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या मुख्यमंत्री आजारी पडले त्याचे अनेक पक्षांनी घाणेरडे राजकारण केले. मुख्यमंत्र्यांच्या पगाराचा हिशोब मागण्यापूर्वी संपातील कर्मचाऱ्यांच्या वर्गणीचा हिशोब द्यावा, असे आव्हान मनीषा कायंदे यांनी केले आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. ते त्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत.
सदावर्ते मुख्यमंत्र्यांच्या पगार कपातीबाबत चर्चा करत आहेत. मात्र मागील दोन महिने सुरु असलेला संप आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्गणीबाबत काहीच बोलत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न बंद असून सुद्धा त्यांना अनाठाई या संपाच्या जागी खर्च करावा लागत आहे. संघर्षाच्या नावाखाली गोळा केलेल्या वर्गणीचा हिशोब त्यांनी प्रथम द्यावा.
आणि मुख्य गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री हे नोकरी करत नसून ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रीय आहे. ते केवळ पगारासाठी कोणतेही काम करत नाहीत, असे त्यांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले.