रत्नागिरी नगर पालिकेने माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत पुन्हा प्लास्टिकमुक्त शहर अभियान सुरू केले आहे. त्यासाठी बाजारपेठेतील व्यापार्यांसह, फेरीवाल्यांवर कारवाई करत पालिकेने १३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे व नगर परिषद कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.
शहरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, स्वीट मार्ट या ठिकाणी प्लास्टिक बंदी विरोधात धडक मोहिम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच दुकानांमध्ये प्लास्टिक वापरणार्यांवर १८ विक्रेत्यांना १३ हजार ७०० रुपये एवढा दंड आकारण्यात आला. यापुढे कारवाईची मोहिम तीव्र करण्यात येणार असल्याचे संदेश कांबळे यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. चिपळूण, खेड तालुक्यामध्ये सुद्धा प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. येथील नगर परिषदेकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ही कारवाई करण्यात येत आहे. शहरातील व्यावसायिकांकडून दंड देखील वसूल करण्यात येत आहे.
खेड नगरपालिका कार्यालय प्रमुख रजनीकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, ज्ञानेश्वर सुतार, राजेंद्र तांबे, सुबोध जाधव व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शहरातील फळे व भाजीपाला विक्रेते, स्वीट मार्ट या ठिकाणी प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केली. प्लास्टिक पिशव्या जप्त करून विक्रेत्यांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. आणि घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने एखादी कापडी पिशवी स्वत:बरोबर बाळगणे अशक्य नाही आहे. त्यामुळे आपले नगर प्लास्टीकमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.