एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर जनतेची नाराजगी दिसून येऊ लागली आहे. एसटीच्या सेवा पुन्हा लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठी माळनाका येथील डेपोजवळ सभा आणि माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विना परवानगी मोर्चा काढताना, कोरोना निर्बंधाचे तीनतेरा वाजवत मास्क न लावणे, सोशल डिस्टनसिंग न पाळल्याप्रकरणी ओबीसी मोर्चामध्ये नंदू मोहिते यांच्यासह अडीचशे ते चारशे जणांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना काळामध्ये कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता सभा व मोर्चा आयोजित करुन सभा ठिकाणी स्पिकर लावुन विभागीय कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी पर्यंत असा मोर्चा काढण्यात आला. कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव वाढु शकतो याची माहिती असताना सुद्धा जनसमुदाय जमवल्याप्रकरणी तसेच मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजेंद्र फुटक यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नंदकुमार धोंडु मोहिते, राजीव यशवंत कीर, नरेश सदाशिव जाधव, रमेश गोविंद केळकर, सचिन नारायण वायंगणकर, सुभाष धर्मा कांबळे व सुमारे ६० विदयार्थी, विदयार्थीनी व नागरीक असे सुमारे २५० ते ४०० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५० ते ४००च्या मोठ्या संख्येने लोकांचा जमाव गोळा करुन यामध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता तसेच मास्क न करता मोर्चामध्ये सहभागी झाले. सहभागी जमावाने सोशल डीस्टन्सचे देखील पालन केले नाही. जमलेल्या जमावामध्ये कोरोनाबाधित असु शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.