कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे गाडय़ांना असलेला विशेष दर्जा काढून त्या नियमितपणे चालवल्या जात आहेत. यामध्ये अनारक्षित गाडय़ाही रुळावर आल्या आहेत. कोरोना संकटाचे कारण सांगून मागील दीड वर्षापासून बंद असलेले रेल्वेकडून मिळणारे ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद करण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. रेल्वेसह शाळा, महाविद्यालये, आस्थापना असे सर्व काही सुरू झाले असताना सवलती पूर्ववत का सुरू केल्या जात नाहीत, असा संतप्त सवाल जेष्ठांनी केला आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाची लाट सुरू होताच रेल्वे प्रवासावर निर्बंध आले. रेल्वेगाडय़ांना गर्दी होऊ नये, यासाठी कोरोनात ज्येष्ठ नागरिकांची सवलत तात्पुरती बंद करण्यात आली. मात्र वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र ती सवलत सुरूच ठेवण्यात आली होती. अशा अकरा सवलती सुरूच आहे. रेल्वे प्रशासनाकडून ६० वर्ष असलेल्या ज्येष्ठ पुरुषांना तर ५८ वर्ष असलेल्या ज्येष्ठ महिलांना तिकीटांमध्ये सवलत सुरु होती. तिकीटांमध्ये पुरुषांना ४० टक्के तर महिलांना ५० टक्के सवलत दिली जात होती. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांबरोबर इतर सवलती पात्र असलेल्या ५४ श्रेणीतील लोकांना पूर्ण शुल्क भरूनच प्रवास करावा लागत आहे.
एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट एक्सप्रेसबरोबर इतर रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर इतर सवलती मिळणारे नागरिक प्रवास करीत होते. कोरोनामध्ये बंद असलेली मेल, एक्सप्रेसमधील अनारक्षित तिकीट सेवाही नुकतीच सुरू केली. तर यात पास प्रवासाचीही मुभा दिली. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या बंद असलेल्या सवलतीचा विचार अद्याप केलाच जात नाही.