राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी चांगलच गाजलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एक पेनड्राईव्ह सभागृहात सादर करून आणि वक्फ बोर्डावरील सदस्याचे कसे दाऊदशी संबंध आहेत, हे दर्शवून नवा बॉम्ब टाकला. याशिवाय, सरकारी वकील प्रवीण चव्हाण प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे न देता सीआयडीकडे दिल्याने विरोधी पक्ष भाजपाने सभात्यागही केला गेला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले, “मूळातच जो पेनड्राईव्ह मी दिला आहे त्यामध्ये स्पष्टपणे कट दिसतोय. कशाप्रकारे गिरीश महाजनांकडे रेड टाकायची, त्या रेडमध्ये काय काय ठेवायचं आणि हे प्रत्यक्षात घडल आहे. जे त्या सीडीमध्ये दिसतय ते सगळं घडलय. केवळ एवढच नव्हे तर, अजून अनेक प्रकरण त्यामध्ये आहेत, ती सगळी प्रत्यक्ष घडलेली आहेत.
प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या मोठ्या नेत्याचं आणि मंत्र्यांचं नाव हे वकील घेत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे पोलीस त्यांची चौकशी कशी करणार! कारण पूर्णपणे त्यांच्यावर दबाव असणार आहे. म्हणून आम्ही अतिशय स्पष्टपणे मागणी केली होती, की हे प्रकरण सीबीआयकडेच द्यायला पाहिजे.
आज वळसे पाटील यांच्यासारखा अनुभवी आणि मुरलेले राजकीय व्यक्तीमत्व देखील सारखे उत्तर देताना अडखळत होते, कारण त्यांना मनातून माहीत होतं की आपण जे उत्तर देतोय ते पूर्णत: चुकीचे देतो आहे. त्यामुळे या मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत ही चौकशी सीबीआयकडे जात नाही आमचा लढा सुरूच राहणार आहे. आम्ही न्यायालयात देखील जाणार आहोत.