राज्य सरकारने कोकणवासीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात विशेषकरून सणासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून जर कोणी अवास्तव भाडे आकरत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय आज विधिमंडळात परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे. तसेच मुंबईहून शिमग्यासाठी जादाच्या बसेसही सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोकणात गणेशोत्सव किंवा होळी या महत्वाच्या सणाला रेल्वे तसेच एसटीचे रिर्झवेशन ५-६ महिने आधीच बुकींग केले जाते. ऐन मोसमाच्या वेळी खासगी बसेस जादाचे भाडे आकारतात. राज्य सरकारने अवास्तव भाडे आकारण्यावर आता थेट टाच आणून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमच्याकडून कोणी खाजगी वाहन अवास्तव भाडे कोणी आकरत असेल तुम्ही यासंदर्भात माहिती शासनाला कळवू शकता असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे. याशिवाय प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जादाच्या बसेसही मुंबईहून सोडण्यात येणार आहेत.
१६ ते २७ मार्च २०२२ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत. तसेच एसटी संपाचा गैरफायदा घेवून खासगी बसेसनी प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारु नये, याबाबत अनेक प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यादा भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करणाऱ्यांवर परिवहन आयुक्त यांनी दोषींवर कारवाई करावी, असे थेट आदेश दिल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
गावाकडे जाणाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, मुंबई सेंट्रल, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून रत्नागिरी, खेड, चिपळूण, कणकवली, सावंतवाडी आदी भागामध्ये या जादाच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी वाहतूक विभागाची पूर्ण तयारी झाली आहे.