कोकण आणि शिमग्याचे एक अनोखेच समीकरण आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या भयंकर काळानंतर यंदा शिमगोत्सव एकदम उत्साहात साजरा केला गेला. होळी, धुलीवंदन आणि विकेंड अशा आलेल्या लागोपाठ सुट्ट्यांमुळे अनेक चाकरमानी गावाला पालखीसाठी दाखल झाले. शिमग्याचा सण साजरा करून अनेक चाकरमानी मार्गस्त सुद्धा झाले. रेल्वेला यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला असून, एसटी संपामुळे मात्र मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे सुद्धा हाल झाले आणि एसटीचे सुद्धा आर्थिक नुकसान झाले.
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीची पालखी आज रंग खेळण्यासाठी दुपारी १.०० वाजता सहाणेवरुन उठेल व चार पोलिस कर्मचा-यांची सशस्त्र सलामी घेवून सावंत-खोत वठारातून श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरुन गाडीतळ येथे ३.३० वाजेपर्यत येईल, पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात संध्याकाळी ४.३० वाजता पोहचेल.
तेथून पुढे शहर पोलीस स्टेशनला पोहचेल, पुढे धनजी नाक्यावरुन, राधाकृष्ण नाक्यावर संध्याकाळी ६.३० वा. येईल व पुढे राम आळी, राम मंदिर येथे संध्याकाळी ७.०० येईल, पुढे मारुती आळी, गोखले नाक्यावरुन, ढमालनीच्या पारावर रात्री ९.०० वाजता पालखी येईल. तेथून पुढे विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभा, कॉग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर येथे रात्री १०.०० वाजता पालखी येईल, पुढे खालची आळी मार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रागंणात रात्री ११.३० वाजेपर्यत येईल. रात्री १२.०० वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल, नंतर धुपारत व गावाचे गार्हाणे होवून शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मंदिरात पुन्हा आल्यावर श्री देव भैरीच्या शिमग्याची सांगता होते.