रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिला व बालकल्याण विभागातर्फे महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये वादाचे बहुसंख्य प्रश्न समुपदेशनातून सुटू शकतात असे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी या पध्दतीने समुपदेशनातून एकूण ८३ टक्के प्रकरणावर तोडगा निघाला असून, मार्गी लागली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, चिपळूण खेड आणि रत्नागिरी या चार ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. महिलांना त्रासदायक ठरणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्याचे काम या केंद्रामार्फत करण्यात येते. यामध्ये थेट येणारी प्रकरणे असतात, तर काही प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत येथे दाखल होतात.
महिलांना घरात सहन कराव्या लागणाऱ्या समस्या तसेच घरातील वाद आणि काही वेळा कौटूंबिक वादविवाद याचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना तक्रार नोंदवून या अन्यायाविरुध्द दाद मागता येते. प्रत्येक प्रकरणी संबंधितांना समुपदेशन केल्यास यावरुन उत्तम तोडगा निघू शकतो असेही निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यात मार्च अखेर एकूण ३८३ प्रकरणे दाखल झाली होती. यात महिलांनी स्वत: दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या ३७२ इतकी होती. चिपळूण येथील आठ व राजापूर येथील तीन प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत दाखल करण्यात आली होती. या प्रकरणांपैकी ८३ टक्के म्हणजे ३१८ प्रकरणे वर्षभरात निकाली निघाली हे नक्कीच उल्लेखनीय आहे.
६५ प्रकरणी अद्यापी निकाल लागला नाही. निकाल प्रक्रियेत संरक्षण अधिकारी तसेच पोलींसाची मदत घेण्याची अनेकदा गरज भासते अशी ३३ प्रकरणे संरक्षण अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये ४६ प्रकरणी पोलीस दलाची मदत झाली आहे.
समुपदेशन केंद्रनिहाय दाखल व निकाली प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत. रत्नागिरी- दाखल १२२, निकाली ७७, प्रलंबित ४५, राजापूर – दाखल ६१, निकाली ५७, प्रलंबित ४, चिपळूण – दाखल ९१, निकाली ८४, प्रलंबित ७, खेड- दाखल १०९, निकाली १००,प्रलंबित ९ प्रकरणे आहेत.