महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनंतर आता राज्यात देखील कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी लोकांना घाबरू नका असे आवाहन केले. म्हणाले की, राज्यात कोरोना महामारीची चौथी लाट दिसू शकते, तसेच राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही अजूनही प्रत्येकाला घराबाहेर पडताना मास्क घालण्यास सांगत आहोत. आम्ही मास्क घालणे बंधनकारक केलेले नाही, पण गरज पडली तर लवकरच त्याची अंमलबजावणी करू. मी जनतेला लसीचा बूस्टर डोस वेळेवर घेण्याचे आवाहन करत आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू केले जाणार का? यासंदर्भात दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरु आहे. याचसंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यामध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याचा पुन्हा निर्णय घेतला जाईल का, असे विचारण्यात आले असता अजित पवार यांनी जर तरच्या भाषेत या प्रश्नाला उत्तर दिले.
डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा घेतला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे, “आमची डोसवर नजर आहे. पण जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे, तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु,” असे अजित पवार म्हणाले. पत्रकार परिषद संपण्याच्या आधी एका मराठी महिला पत्रकाराने मास्क बंधनकारक करण्यावरुन पुन्हा अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांनी काही राजकारण्यांनी मास्क न घातल्याने पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा नाव न घेता उल्लेख केला.