कोकणामध्ये मागील दोन वर्षापासून रस्त्यांच्या अवस्थांची झालेली दुर्दश लक्षात घेता, त्यावर जोपर्यंत पक्का उपाय केला जात नाही तोपर्यंत जनता शांत बसणार नाही. कोकण रेल्वेमार्गावरील सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. चालकांना खड्डे चुकवत वाहन चालवताना एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची सद्यःस्थिती पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सोबतच वाहनांचे आणि चालकांचे शारीरिक नुकसान होत आहे ते वेगळेच.
सोल्ये येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन तांबे, अॅड. हरेश तांबे, चंद्रकांत तांबे, मिलिंद कदम, अरुण शिंदे यांनी वाहनांची कायम वर्दळ असलेल्या या रस्त्यातील खड्डे बांधकाम विभागाने तातडीने बुजवावेत अन्यथा, त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशाराच दिला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकावर कोकण रेल्वेच्या अनेक गाड्याना थांबा आहे. त्यामुळे या स्थानकाला महत्व असून त्या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरूच असते.
राजापूर शहराकडून सोल्ये येथील स्थानकाकडे जाणारा रस्ता पुढे केळवली आदी गावांना जोडत पुढे जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सातत्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. मात्र या रस्त्याची सद्यःस्थितीमध्ये पुरती चाळण झालेली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून हे खड्डे चुकवून वाहने चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.
नागमोड्या वळणांच्या या रस्त्यावरून खड्डे चुकवत वाहने चालवताना काहीवेळा अपघातासारखे गंभीर प्रसंगही निर्माण होताना दिसतात. रस्त्याची ही दुरावस्था दूर करण्यासाठी बांधकाम विभागाकडून जांभ्या दगडाने हे खड्डे बुजवले जातात; मात्र जांभ्या दगडाने बुजवलेले खड्डे तात्पुरती मलमपट्टी ठरत असलेले कालांतराने दिसून येत आहे.