मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरात दाणादाण उडालेली असतानाच ठाणे जिल्ह्यातून एक वाईट बातमी हाती आली आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान एक चार महिन्यांचे तान्हुले बाळ वाहुन गेले आहे. आपल्या डोळ्यादेखत आपले बाळ वाहून गेले हे पाहून आईने हंबरडा फोडला आणि साऱ्यांचे डोळे पाणावले. दरम्यान, या बाळाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम आटोकाट प्रयत्न करत आहे. दुपारी २.५५ च्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून निघालेली अंबरनाथ लोकल कल्याण-ठाकुर्ली दरम्यान २ तास उभी करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवासी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यातच एक छोटेसे बाळ घेऊन एक महिला व तिचे काका चालत होते. त्यावेळी अचानक त्या काकाच्या हातून ४ महिन्यांचे बाळ निसटले आणि थेट नाल्याच्या पाण्यात जाऊन पडले. काही क्षणातच हे बाळ नाल्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले.
आईचा आक्रोश – काही तरुणांनी लगेच नाल्याच्या दुसऱ्या बाजुला धाव घेत बाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाही. दुसरीकडे पिडीत मातेच्या आक्रोशाने बदलापूर लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही डोळे पाणावले. बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
लोकलसेवा विस्कळीत – दिवा स्थानकाच्या पुढे लोकल २, तासांपेक्षा अधिक वेळ थांबल्यामुळे बदलापूर लोकलही थांबली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांनी ट्रॅकवरून चालत जाणे पसंत केले. मात्र हेच या मातेच्या अंगलट आले. अंबरनाथ- बदलापूर दरम्यान काही ठिकाणी रुळाखालील खडीही वाहून गेली आहे. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक – या हृदयद्रावक घटनेमुळे केवळ ठाण्यातच नव्हे तर अख्ख्या मुंबईत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना ही बातमी सम जली तेव्हा त्यांनीही दुःख व्यक्त केले. चार महिन्यांचे बाळ वाहून गेल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. विशेष कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे त्यांनी म्हटले आहे.