राजापूर तालुक्यातील भू गावातील कुंभारवाडी येथे राहणाऱ्या एका २२ वर्षाच्या युवकाने व्यसनामुळे झालेल्या भांडणातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऋषिकेश सुरेश कुंभार असे या युवकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले की, भूगावातील कुंभारवाडी येथे ऋषिकेश सुरेश कुंभार याला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनातून दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९ वाजल्यानंतर घरी त्याचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग डोक्यात धरून त्याने टोकाचे पाऊल उचलत सगाच्या भरात विषारी औषध प्राशन केले. बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली.
अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेशला घरच्यांनी व नातेवाईकांनी तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला तातडीने मुंबईला नायर रुग्णालयात पुढील उपचारांकरता दाखल करण्यात आले. मुंबई येथील नायर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना ऋषिकेश याचा अखेर मृत्यू ओढवला. अवघे २२ वर्षे वय “असलेल्या या युवकाने टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ० क्रमांकाने नोंद करून तपास राजापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे. राजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.