आकाशवाणीच्या जिल्हा केंद्रांवरील स्थानिक कार्यक्रम बंद करून मुंबई केंद्राचेच कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान प्रक्षेपित करण्याचा आदेश प्रसार भारतीने दिला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे समजते आहे.
राज्यात आकाशवाणीची जिल्हास्तरावर एकूण २८ केंद्र आहेत. त्यामधील रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, परभणी ही मोठी केंद्र आहेत. या केंद्रांवरून स्थानिक कार्यक्रमांचेही प्रक्षेपण अधिक प्रमाणात होत असते. त्यामुळे स्थानिक निवेदक, कलाकार यांना सुद्धा आपले हुनर दाखवण्याची संधी मिळते. तसेच स्थानिक कार्यक्रमांनाही तेथे व्यासपीठ उपलब्ध होत असे. त्यातून प्रत्येक शहराची आणि शहरातल्या कलाकारांची तसेच परिसराची माहिती श्रोत्यांना घरबसल्या मिळत होती, परंतू या नव्या आदेशामुळे स्थानिक कलाकारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
प्रसार भारतीच्या नव्या आदेशानुसार, पहिल्या टप्प्यात सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होणारे कार्यक्रमच स्थानिक केंद्रांनी प्रक्षेपित करायचे बंधनकारक करण्यात आले आहेत. या नवीन धोरणानुसार प्रसार भारतीने प्रमुख केंद्रांना नव्या आदेशाचे पत्र १९ जानेवारीला पाठविले आहे. प्रसार भारतीच्या अतिरिक्त महासंचालकांतर्फे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष जाधव यांची त्यावर स्वाक्षरी आहे.
पुढच्या टप्प्यात ‘आकाशवाणी महाराष्ट्र’ या एकाच केंद्रावरून राज्यात कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा प्रसार भारतीचा मानस असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे, प्रत्येक जिल्हा केंद्राची जी स्वतःची ओळख असते आणि काही कार्यक्रम पार पाडतात, ते आता यापुढे संपुष्टात येणार आहेत. आता स्थानिक कलाकार, कार्यक्रम आणि स्थानिक निवेदकांवरही प्रसार भारतीच्या नव्या आदेशामुळे एक प्रकारची बंदी आली आहे. अनेक गावांमध्ये सकाळच्या प्रहरी सुरु होणाऱ्या आकाशवाणीच्या या कार्यक्रमांना अनेक श्रोते मुकणार आहेत.