बिग बॉसचे सर्वच पर्व कायमच चर्चेत असतात. कधी स्पर्धकांमधील वादामुळे तर कधी स्पर्धकांमधील लव्हस्टोरीमुळे. त्यामध्ये होस्ट सलमान खान देखील नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडतच असतो. सध्या बिग बॉसचे १५ वे पर्व सुरू असून, त्याचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी शो मधून बाहेर पडल्यावर सलमान खानवर केलेले गंभीर आरोप हे आहे.
सलमान खानच्या बिग बॉस १५ मधून अभिजीत बिचुकले नुकताच बाहेर पडला. अशातच वादग्रस्त बिचुकलेने सलमान खानवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. सलमानला आपल्यापेक्षा कोणी मोठं झालेलं पहावत नाही, त्याचा मागील वीस वर्षांचा इतिहास बघा, कोण आहे हा सलमान? “असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला” असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम प्रसिद्ध असलेला अभिजीत बिचुकले नुकताच ‘बिग बॉस १५’ मधून बाद झाला. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिजीत आणि देवोलिना भट्टाचार्जी या दोघांचं एलिमिनेशन झालं आहे. शो मधून बाहेर पडताच तो आपल्या कुटुंबाला भेटायला गेला असता, प्रसार माध्यमांशी बोलताना त्याने सलमानवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
अभिजीत बिचुकले म्हणाला,” बिग बॉसच्या घरात माझ्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला.” सलमानला वाटतं की त्याच्यामुळे फक्त शो चालतो. मात्र हा पंधरावा सिझन मी गाजवला आणि इथे मात्र तो माझ्यापुढे कमी पडला. त्याने जशी भाषा माझ्यासाठी वापरली, तशी आजपर्यंत मला कोणी वापरली नाही. “ वाघ पिंजऱ्यात आहे, म्हणून तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईन की मी काय आहे” अशा प्रकारची वादग्रस्त टिपण्णी त्याने केली आहे.