रत्नागिरी जिल्ह्यात कोविड काळामध्ये आरोग्य यंत्रणेवर जास्त प्रमाणामध्ये ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या सर्व प्रशिक्षणार्थी अधिपरिचारिका म्हणून विविध कोविड रुग्णालयामध्ये मानधन तत्वावर काम करत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आदेशानुसार दि. ५ मे ते ५ जुलै या कालावधीमध्ये कोविड सेंटर मध्ये मानधनाच्या आश्वासनावर काम करत होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या सर्व प्रशिक्षणार्थी अधिपरिचारिका जिल्हा रुग्णालयाच्या आदेशानुसार हॉस्पिटलमध्ये विविध कक्षांमध्ये सेवा बजावत होतेत आणि त्या संबंधीचे उपस्थिती पत्रक आणि हजेरी पत्रक देखील रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. परंतु सदर कालावधीमध्ये काम केल्याचे वेतन अद्यापही त्यांना मिळालेले नाही. गेल्या महिनाभरापासून सदर विद्यार्थी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आपल्या मानधनाबाबत विचारणा करत आहेत, परंतु त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सदर विषयाला अनुसरून आज दि. ९ जुलै २०२१ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रत्नागिरी शाखेच्या वतीने कोविड-१९ च्या कालावधीमध्ये कोवीड सेंटर मध्ये काम केलेल्या प्रशिक्षणार्थी अधिपरिचारिकांचे वेतन तीन दिवसांमध्ये देण्यात यावे या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे कामाचे वेळापत्रक व्यस्त असल्याने सदरचे निवेदन परिचलन अधिकारी श्री.दत्ताराम कोकरे यांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे, अभाविप रत्नागिरी शहर मंत्री अमृता तांबे हिने “कोविड कालावधीत कोविड सेंटरमध्ये काम केलेल्या सर्व अधिपरिचारिकांचे वेतन येत्या तीन दिवसांमध्ये देण्यात यावे. अन्यथा सोमवार दि. १२ जुलै २०२१ रोजी विद्यार्थी परिषद आक्रमकतेचा पवित्रा घेऊन निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल” असे सूचक वक्तव्य केले.