पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला गती देण्यात यावी त्या अनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रूंदी’ साठीचे ना हरकत प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला आज मुंबईच झालेल्या बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामकाजाचा आढावा मंत्रालयातील त्यांच्या दालनात घेतला.
या बैठकीला खासदार सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, गृह (बंदरे) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड उपस्थित होते. रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला गती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘या महामार्गाचे काम गेल्या चार दशकांहून अधिक काळ रखडले आहे.
महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी मार्च २०२२ मध्ये प्रकल्पाच्या अंतिम आखणीस शासनस्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेवस ते कारंजा खाडीदरम्यानच्या धरमतर खाडीपुलासाठी ३ हजार ५७ कोटींच्या अंदाजित खर्चाच्या बांधकामाला देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मेरिटाईम बोर्डामार्फत नौकावहनासाठी आवश्यक असणाऱ्या गाळ्याची उंची व रूंदीसाठीचे ना हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने या पुलाच्या निविदेबाबतची पुढील कार्यवाही करता आली नाही. त्यामुळे धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाचे काम तत्काळ सुरू होण्यासाठी मेरिटाईम बोडनि आवश्यक बाबींची पूर्तता करून गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.’