रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, लोकशाहीचा हा उत्सव शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी कंबर कसली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीसाठी. ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. यावेळच्या निवडणुकीत जिल्हा. परिषदेच्या ५५ जागांसाठी १५१ उमेदवार नशीब आजमावत आहेत, तर पंचायत समितीच्या ११० गणांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी जिल्ह्यात एकूण १,६९३ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
यंत्रणा आणि कर्मचारी नियुक्ती – मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने ४,२६६ मतदान यंत्रे (EVM²) सज्ज ठेवली आहेत. या प्रक्रियेसाठी ५,४५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. ७ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल, त्यासाठी प्रत्येक केंद्रावर पुरेसा कर्मचारी वर्ग आणि साहित्याची रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त – निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ७६ पोलीस अधिकारी आणि १,५२४ पोलीस अंमलदार तैनात असतील. सुरक्षेसाठी १,९०० होमगार्ड प्रशासनाला मदत करतील. अतिसंवेदनशील भागांसाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट नाकाबंदी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. ७ तारखेला मतदान पार पडल्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातील आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदारांना निर्भयपणे बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

