गेले तीन ते चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावासाने गुरूवारी रात्रीपासून उसंत घेतल्याने राजापूर शहर बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी ओसरले आहे. अवघ्या २४ तासात राजापुरातील पूरस्थिती बदलली असून शुक्रवारी दिवसभर अनेकवेळा सूर्यदर्शन होत कडकडीत ऊनही पडले होते. पूर ओसरल्याने शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मंगळवारपासून राजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे गुरूवारी राजापूर शहराला पूराचा सामना करावा लागला. यावर्षी पहिल्यांदाच पुराचे पाणी गुरूवारी बाजारपेठेत शिरले. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
शहरातील शिवाजीपथ, वरचीपेठ, शिळ गोठणे दोनिवडे रस्ता, गुजराळी रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. ‘तर अर्जुना नदीकिनाऱ्या लगतच्या भातशेतीमध्येही पूराचे पाणी शिरले होते. राजापूर बाजारपेठेत पूराचे पाणी शिरत असताना नदीपात्रालगतच्या नागरिक व व्यावसायिकांनी आपल्या दुकानांतील साहित्य सुरक्षितस्थळी हलविल्याने कोणाचेही नुकसान झालेले नाही.
गुरूवारी रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने पूराचे पाणी कमी होण्यास सुरूवात झाली होती. शुक्रवारी सकाळी पूराचे पाणी पूर्णपणे ओसरले होते. त्यामुळे पूराच्या पाण्यामुळे दुकानात साचलेला चिखल साफ करून व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यास सुरूवात केली. शिवाजीपथ मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अग्नीशामक बंबाच्या सहाय्याने पाणी मारून रस्ता साफ केला.