भाजपचे आमदार नितेश राणे यांना आज गुरुवारी कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तसेच अधिक उपचारासाठी त्यांना सिंधुदुर्गातील ओरोस शासकीय इस्पितळाकडे पाठविण्यात आले. मागील चार दिवस ते सीपीआरच्या कार्डियाक विभागात उपचार घेत होते. दरम्यान, बुधवारीच त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर गुरुवारी ते पुन्हा कोकणात परतले.
गुरुवारी सकाळी त्यांना पोलिस बंदोबस्तात सीपीआर इस्पितळातून सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. सीपीआर आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दहा वाजण्याच्या सुमारास सरकारी रुग्णवाहिकेतून ते फोंडा घाटमार्गे सिंधुदुर्गकडे रवाना झाले आहेत. ओरस रुग्णालयात ते पुढील उपचारासाठी जाणार असल्याचे समजते आहे.
संतोष परब हल्लाप्रकरणी अखेर जामीन मिळाल्यानंतर बाहेर पडल्या-पडल्या नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री नेमकं अधिवेशनाच्या वेळी गळ्यात बेल्ट का घालतात! यांना ईडीच्या कारवाई सुरू झाल्यावरच यांना कोरोना कसा होतो, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, जनतेला त्रास नको म्हणून मी स्वतःहून शरण आलो, मला कोणी अटक केलेली नाही. मात्र, आता तब्येत बरी होईपर्यंत मी घरी आराम करणार आहे. मला निव्वळ या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. मी पुढील तपासणीसाठी ओरस रुग्णालयात जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व तपासासाठी पोलिसांना मदत करणार आहे.
आतापर्यंतच्या कोणत्याही तपास कार्यात पोलिसांना मी सहाय्यच केले आहे, कोणतेही अडथळे आणले नाहीत. एक जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांना सहकार्य केले. सध्या तब्ब्येत बरी नसल्याने मतदारांना भेटू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मी बरा झाल्यानंतर बोलेन, त्या दिवशी खूप लोकांचा बीपीचा त्रास सुरू होईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.