हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात २० सप्टेंबरपासून, तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत २१, २२ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाला पोषक असे वातावरण राज्यामध्ये पुन्हा निर्माण झाल्याने, २० सप्टेंबरपासून तीन ते चार दिवस विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जाणारे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, त्याचेच परिणाम महाराष्ट्रातही पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठराविक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिला गेला आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पावसाचे वर्तमान देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात व मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस,उत्तर-मध्य महाराष्ट्रामधील धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत २० सप्टेंबरपासून तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत काही भागांत २०, २१ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे अनेक जिल्ह्यांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील कोकणामधील काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेली परिस्थिती अतिशय गंभीर होती.