दिल्लीसह देशातील मुंबई, पुणे आदी प्रमुख शहरांच्या वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. त्या धर्तीवर दिवाळीतील फटाक्यांच्या धुरामुळे या प्रदूषणात भर पडणार आहे. जिल्ह्यातील शहरांच्या हवा गुणवत्तेचीही तपासणी होणार आहे. त्यासाठी फिरते गुणवत्ता निरीक्षण केंद्र (वाहनातील प्रयोगशाळा) रत्नागिरीत दाखल झाली आहे. रत्नागिरी पालिकेच्या आवारात ही व्हॅन उभी करून हवा गुणवत्ता तपासली जात आहे. त्यानंतर चिपळूण आणि खेडमध्ये ही व्हॅन जाणार आहे. या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता समोर येणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे त्यामध्ये वाढ होत आहे. तर नव्या बांधकामांसह मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांमुळे जिल्ह्यात धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही फिरती प्रयोगशाळा कार्यान्वित केली आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे ही पातळी १०० डेसिबलच्या पुढे जाऊ शकते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील प्रमुख ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाचे ध्वनिमापन केले जात आहे. लक्ष्मीपूजन व तत्सम दिवशी प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते १० हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने हा परिसर आवाजाने दुमदुमून जातो. ध्वनिप्रदूषण मापनासाठी शांतता क्षेत्र, रहिवाशी भाग, औद्योगिक क्षेत्र अशा वेगवेगळ्या परिसराची निवड केली आहे.
प्रदूषण मंडळाकडे चार जिल्ह्यांसाठी मिळून एक फिरते वातावरणीय हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र अर्थात वाहनातील प्रयोगशाळेची उपलब्धता झाली आहे. मंडळाची काही विशिष्ट ठिकाणी स्थायी स्वरूपाची निरीक्षण केंद्रे आहेत.