धरण फुटून तीन वर्षे झाल्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे; परंतु याबाबत पाटबंधारे विभागाने खबरदारी घेत तीन वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून धोकादायक धरणांची दुरुस्ती करून ती मजबूत केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. तीन वर्षांपूर्वी तिवरे धरण फुटून मोठा हाहाकार माजला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. यावरून धरणांच्या सुरक्षेवर बोट ठेवण्यात आले. धरणांच्या सुरक्षिततेकडे डोळेझाक झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने शासन आणि पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले.
पावसाळ्यात धरणांच्या सुरक्षेसाठी गार्ड नेमण्यात आले. धरणांच्या मजबुतीबाबत सर्व्हे झाला. त्या अहवालानंतर विविध धरणांची दुरुस्ती करण्यात आली. जिल्ह्यात ३ मध्यम तर ४६ लहान धरणे आहेत. त्यापैकी पिंपरी, कोंडीवळे, घोळवली अशा धोकादायक धरणांवर विशेष लक्ष केंद्रित केले. टप्प्याटप्प्याने तीन वर्षांमध्ये या धरणांची दुरुस्ती करून ती मजबूत करण्यात आली. तिवरे दुर्घटनेची गाठ पाठीशी असल्याने धरणांच्या सुरक्षेसाठी आधीच खबरदारी घेतली आहे. सलग पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्याची स्थिती समाधानकारक आहे.
जिल्ह्यातील तीनही मध्यम प्रकल्प फुल्ल झाले असून ते ओसंडून वाहत आहे. नद्यांना चांगले पाणी आहे. ४६ लघु पाटबंधारे म्हणजे लहान धरणे चांगलीच भरली आहेत. यंदा पावसाने नागरिकांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रतीक्षा करायला लावली. पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने जिल्ह्यात अनेक दुर्गम भागात पाणी पाणी करण्याची वेळ आली होती. जुलै महिना चांगला पाऊस झाल्याने धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असला तरी आता जिल्ह्यात एकही धरण धोकादायक नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.