मागील साधारण तीन वर्षापासून मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज अतिशय संथगतीने सुरु आहे. एवढ्या संथ गतीने सुरु असलेल्या कामाचा रेकोर्ड बनण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेने अनेक प्रकारची आंदोलने करून देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, अखेर सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, मंत्री यांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे योजिले.
मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर विविध भागात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी आदींनी पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके व राजेंद्र महाडिक ,काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे
पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम आदींनी याबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गावर हे रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन होणार आहे. चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा, लांजा येथे सकाळी १० वाजता हे रास्ता रोको सुरू होणार आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातखंबा येथे महाविकास आघाडीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी सुरू केली असून, हे आंदोलन चांगलेच गाजणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. सर्वच पक्षांच्या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग दणाणून निघणार असल्याचे दिसून येत आहे.