रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मागील २४ तासात १ हजार १३९ अहवालांमध्ये तब्बल ८२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशी जि संख्या ५८ होती ती अचानक वाढली आहे. मात्र सुदैवाने एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू ओढवला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत २३१ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात २४ तासात ८ रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत.
जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना रुग्णवाढीने सर्व शाळा (प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक ) ६ पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी शाळा सुरु झाली होती, मात्र पुन्हा आत्ता ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिला आहे. जिल्ह्यातील गंभीर होणारी कोरोनाची स्थिती आणि नवीन ओमीक्रोनचा धोका लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात लाइव्ह येत हि घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
यासंदर्भात झालेल्या सविस्तर बैठकीनंतर मंत्री नाम. उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. विजेची अनुलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची विशेष दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आजपासून बंद राहणार आहेत, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी सांगितले.