सध्याच्या अति वृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खराब हवामानामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. श्रीनगरमधील अनेक भागात रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. यामुळे पहलगाम आणि बालटाल भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच वातावरण निरभ्र होईपर्यंत भाविकांना बेस कॅम्पमध्ये थांबण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना व्हायरसमुळे तीर्थयात्रा गेल्या आठवड्यात सुरू होण्यापूर्वी दोन वर्षे स्थगित राहिली.
सध्या पावसाची सुरुवात झाल्याने आणि पावसाचा जोर देखील सर्वत्रच जास्त असल्याने अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे स्थगित करण्यात आली आहे, अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन वर्षांच्या अंतरानंतर वार्षिक यात्रेला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांनी अधिकाऱ्यांनी सांगितले की पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पमधून कोणत्याही यात्रेकरूंना पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
काश्मीर खोऱ्यात पुढील २४ ते ३६ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्री उशिरापासून खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी गेल्या आठवड्यात गुरुवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम बेस कॅम्पवर पोहोचली होती. ३० जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७२,००० हून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा ११ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपणार आहे. त्यामुळे वातारणात वारंवार निर्माण होणाऱ्या बदलामुळे अमरनाथ यात्रा कशा तर्हेने पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.